राजकीय

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार

सोहळ्याप्रसंगी सरन्यायाधीश श्री. भूषण रामकृष्ण गवई यांचे "भारताची राज्यघटना" या विषयावर संबोधन

भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांचा 8 जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई पदावरुन निवृत्त होतील, त्या दिवशी त्यांनी एक इतिहास निर्माण केलेला असेल. नगरपालिकेच्या शाळेत शिकलेला, इयत्ता सातवीपर्यंत इंग्रजीचा गंधही नसलेला, आमदार निवासात व्हरांड्यात बसून अभ्यास केलेला एक अतिशय सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे.

अनेक वेळा लोक सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्याच कोषात जातात, पण सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई कधीही कोषात गेले नाहीत. त्यांनी आपले वडील दादासाहेब गवई यांच्याकडून साधेपणाचा, आपलेपणाचा गुण घेतला.

मानवता व संवेदनशीलता हे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांच्या स्वभावातले गुण आहेत. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे व्यापक जनहिताचा मुद्दा असताना कायद्याचा अन्वयार्थ व्यापक जनहितासाठी लावण्यावर सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांनी भर दिला. प्रत्येकवेळी सर्व गोष्टी कायद्याने होतात असे नाही, तर व्यापक जनहित कायद्यात बसवता येते, अशा विचारांनी त्यांनी अनेक निर्णय दिले.

प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढायचा, या विचाराने सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई काम करतात. नुकतेच त्यांनी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या विदर्भातील झुडपी जंगलांसंदर्भात विस्तृत आणि ‘लँडमार्क जजमेंट’ दिले. यामुळे विदर्भातील अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला, तसेच वनांकरताही जमीन मिळाली. याद्वारे त्यांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन गरिबातील गरीबाला मदतीचा प्रयत्न केला. म्हणूनच कायद्याचे इंटरप्रिटेशन करताना व्यापक जनहित गरजेचे, महत्त्वाचे असते, हे त्यांनी आपल्या निर्णयांतून स्पष्ट केले. कमीतकमी न्यायालयीन आदेश देत समन्वयाने, चर्चेने काम करण्याचा प्रयत्नही त्यांनी सातत्याने केला.

सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांच्यासारखा एक मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचा आनंद वाटतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानले.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सरन्यायाधीश श्री. भूषण रामकृष्ण गवई यांनी “भारताची राज्यघटना” या विषयावर संबोधन केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!